Savadhan's Blog


आपणही हे करू शकता ! U can do it !

आपणही हे करू शकता ! U can do it !
अनेकदा काही कारणामुळे झोप येईनाशी होते तेव्हा हा प्रयोग मी आजही करतो.अर्थात सगळ्यांनी हाच प्रयोग करावा असं मी म्हणणार नाही, पण ज्यांना अंकगणितात रस असेल त्यांनी जरूर करुन पहायला काहीही हरकत नाही. इतरांनी दुसरा एखादा मार्ग शोधावा.
मी मनातल्या मनात एक ते पंचवीस पर्यंतचे वर्ग म्हणत राहतो.मला वाटतं हे सगळ्यांना सहज जमत असावं. तरी माहितीसाठी म्हणून ते येथे देतो.[sqs of nos 1 to 25 learn by heart which generates great fun ! see how?]
1×1=1square=01, 2×2=2sq=04, 3×3=3sq=09, 4×4=4sq=16. 5×5=5sq=25, 6×6=6sq=36, 7×7=7sq=49, 8×8=8sq=64, 9×9=9sq=81, 10×10=10sq=100, 11×11=11sq=121, 12×12=12sq=144, 13×13=13sq=169, 14×14=196, 15×15=225, 16×16=256, 17×17=289, 18×18=324, 19×19=361,20×20=400, 21×21=441, 22×22=484, 23×23=529, 24×24=576, 25×25=625. [Try to remember all these squres of the nos 1 to 25 or 25 to 1 in any direction.]
वर एक ते पंचवीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग दिले असून त्यातील एकक आणि दशकाचे अंक ठळक दाखवले आहेत.ठळक अंक स्वतंत्रपणे आठवता आले पाहिजेत तसेच या सर्व वर्ग संख्या उलट-सुलट व आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आठवता येणं हे या खेळाचं मर्म आहे. लहानपणी माझ्या वडिलानी पावकी,निमकी, पाऊणकी, दीडकी शिकवली होती आणि ती पाठ करून घेतली होती. वडिलांना अडिचकी आणि औटकी पण येत असे.परवचा रोजच म्हणावा लागे.त्यामुळे त्याच धर्तीवर मी या संख्यांचे वर्ग तोंडपाठ केले.ती रीत पुढीलप्रमाणे.
बे दुणे चार,तिन त्रिक नऊ,चार चोक सोळा,पाचा पाचा पंचविस, साहीसाहीछत्तीस, सातीसाती एकोणपन्नास, आठीआठी चौसष्ठ, नवेनवे एक्याऐंशी,दाहीदाही शंभर,अक्रेअक्रे एकवीसाशे,बारंबारे चव्वेचाळाशे, तेरंतेरे एकोणसत्तराशे,चौदंचौदे शहान्नवाशे,पंधरंपंधरे पंचवीस दोन,सोळंसोळे छप्पन दोन,सतरंसत्रे एकोणनव्वद दोन, आठरंआठरे चोविस तीन,एकोणीस वर्गे एकसष्ट तीन,वीसवर्गे चारशे,एकविस वर्गे एक्केचाळीस चार,बावीस वर्गे चौरयाऐंशी चार,तेविसवर्गे एकोणतिस पाच,चौविस वर्गे शहाहत्तर पाच,पंचविस वर्गे पंचविस सहा. येथे आपण एकक.दशक स्थानचे अंक एकत्र वाचून शतक,सहस्र स्थानचे अंक एकत्र वाचतो हे ध्यानात घेणे महत्वाचे आहे.या पद्धतीचा आपल्याला मनातल्या मनात गणिती क्रिया करताना खूप उपयोग होतो.गणिताच्या अभ्यासकास यात विशेष असं काही जाणवणार नाही.वैदिक गणिताच्या अभ्यासकासही यात विशेष काही वाटणार नाही.
एकदा ही तयारी झाली की मग तुम्हाला शंभर पर्यंतच्या संख्याचे वर्ग अगदी सहजपणे भराभर मांडता येऊ शकतात किंवा सहज तोंडी आठवू शकता.इतकेच काय यापुढेही मोठमोठ्या संख्यांचे वर्ग आपण पुरेसा सराव झाला कि सांगू शकतो. कसे ते पहा.
“एक ते पंचविस आणि पंचविस ते एक” असे उलट-सुलट शंभरपर्यंयतच्या या वर्गसंख्या एकमेकाशी निगडित असतात हे पक्के ध्यानात घ्यावे.ठळक अंक तसेच ठेऊन उरलेल्या अंकावर मनात प्रक्रिया करून थेट उत्तर मांडावयास शिकणे किंवा सांगायला शिकणे महत्वाचे आहे. अशा आकडेमोडीच्या सरावामुळे मेंदू तरतरीत राहून तो कार्यक्षम होतो,स्मरणशक्तीत वाढ होण्यास मदत होते, असं माझे वडील मला सांगत असत.
आता 26×26=676 शहात्तर सहा म्हणजेच सहाशे शहात्तर.मनातल्या मनात पंचविस अन् एक सव्विस आणि पंचविस वजा एक चोविस ध्यानात घेऊन, चोविस वर्गे “शहात्तर पाच” पैकी पाच मध्ये एक मिळवून सहा येतील, मग म्हणा सव्विस वर्गे–>शहात्तर सहा.
मनांतील हि क्रिया कशी घडते ते [english]आकडे मांडून पाहूया–[
1] 26sq–>[25+1]–>[25-1]=24—>24sq “शहात्तर पाच”,यातील [5+1]=6, मनात म्हणा”शहात्तर सहा”,
26sq–>6 76.
2] 27sq–>25+2–>25-2=23sq “एकोणतिस पाच”यातील 5+2=7,मनात म्हणा “एकोणतिस सात”
27sq–>7 29.
3] 28sq–>25+3–>25-3–>22–>22sq–>चौरयाऐंशी चार,–>4+3–>7,–>मनात चौरयाऐंशी सात,
28sq–>7 84
4] 29sq–>25+4–>25-4–>21–.21sq–> [ ]4–>4+4–>8–>मनात 8 [ 41 ],29sq—>8 41
5] 31sq–>25+6–>25-6–>19,19sq–>[ ] 3–>3+6–>9–मनात 9[61]= 9 61
6] 32sq–>25+7–>25-7–>18sq–>[ ]3–>3+7–>10–मनात10[24]= 10 24
7] 33sq–>25–>8–>17–>[ ]2–>2+8–>10[ 89]—मनात10 89
8] 34sq–>25–9–>16–>[ ]2–>2+9–11[56]–मनात 11 56
9] 35sq–>25–10–>15–>[ ]–2+10–मनात 12 25
याप्रमाणे आपण पन्नास पर्यंतच्या संख्याचे वर्ग सहज करू शकतो.येथे पंचविस ही संख्या पायाभूत संख्या समजलेली आहे.५०ते१०० पर्यंतच्या संख्यांचे वर्ग थोडासा बदल करुन अगदी सहज तोंडी करता येतात.४० ते ७५ या संख्यांचे वर्ग करताना ५० या संख्येचा उपयोग करुन वर्ग करणे सोपे जाते.पण यास बराच सराव करावा लागतो.
उदा-४१वर्ग–>२५ अन् सोळा=४१,मनात धरा १६. आता ४१अन् नऊ=५०,मनात ९चा वर्ग८१धरा.४१चा वर्ग=१६ ८१.
४६वर्ग–>२५अन् २१=४६,मनात धरा २१,आता ४६अन् ४=५०,मनात ४चा वर्ग १६ धरा,४६चा वर्ग=२१ १६.
४९वर्ग—>२५अन् २४=४९,मनात धरा २४,आता ४९अन् १=५०,मनात १चा वर्ग ०१धरा,४९चा वर्ग=२४ ०१.
५४ वर्ग–>२५अन् २९=५४,मनात धरा २९, आता ५४ अन्(-४)=५०,मनात(-४)चा वर्ग धरा१६,५४वर्ग=२९ १६.
५५ वर्ग–>२५+३०=५५, मनात धरा ३०,आता मनात (-५)चा वर्ग २५ धरा, ५५वर्ग=३० २५.
५९ वर्ग—>२५+३४=५९,मनात धरा३४,आता मनात नऊचा वर्ग८१. ५९वर्ग=३४ ८१.
६४वर्ग—>२५+३९=६४,मनात धरा ३९,आता मनात १४चावर्ग १ ९६, ६४वर्ग=(३९+१) ९६ =४० ९६.
६९वर्ग–>२५+४४=६९, मनात धरा ४४,आता मनात १९चा वर्ग ३ ६१, ६९वर्ग=(४४+३) ६१ =४७ ६१.
७२वर्ग—>२५+४७=७२,मनात धरा ४७,आता मनात २२चा वर्ग ४ ८४, ७२वर्ग=(४७+४) ८४ =५१ ८४
वरील वर्ग संख्यांचे निरीक्षण केले तर आपल्या ध्यानात येईल कि १ ते २५ या वर्ग संख्यांचे ठळकपणे दाखवलेले एकक आणि दशक स्थानचे अंक पुन्हा पुन्हा उलट-सुलट त्याच क्रमाने येत असतात.जरा निरिक्षण करुन तर पहा.७६ते१०० पर्यंत च्या संख्यांचे वर्ग करुन पहा. काय अडचण येते आणि त्यावर आपण कशी मात करू शकतो ते शोधा. कॅलक्युलेटरमुळे आता सगळच सोपं झालं पण त्यामुळे मॆंदूला काम उरले नाही,त्यामुळे तो तरतरीत ठेवण्याचे इतर मार्ग आपण शोधायला नकोत का?
याप्रमाणे दोन अंकी संख्यांचे वर्ग अगदी सहजपणे आपण करू शकतो. माध्यमिक शाळेतील आपल्या मुलामुलीना हे शिकवताना मस्त मजा येते.त्यांना गणितात रस वाटू लागतो. गणिताची भिती नाहिशी होते हा माझा अनुभव आहे.

आपणही हे करू शकता ! U can do it ! वर टिप्पण्या बंद

—— home ! घर असावे घरासारखे !

Posted in मराठीप्रेमी,social by savadhan on 07/07/2010
Tags: , , , , ,

—— home ! घर असावे घरासारखे !

पुण्यात असतो तेव्हा एकदोन महिन्यानी शिवथरघळ येथे जाणं होतं. मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठान ची संकल्पना राबवणारे सुधाकरशेठ, त्यांना मनापासून साथ देणारे त्यांचे मित्रवर्य स्मॅश इलेक्ट्रिकल्सचे संचालक चितळे,अरिहन्त इलेक्ट्रिकल्सचे संचालक ओसवाल अशी मोजकीच मंडळी बरोबर असतात. मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठानची संकल्पना प्रत्यक्ष राबवण्यासाठी महाड जवळील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची मोलाची मदत होत आहे. त्यांच्या कामाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने तेथे वारंवार जाणं घडतं. या कामात त्यांना आमची काही मदत हवी असेल तर ती देण्यात येते ,काही अडचणी असतील तर त्यांचं निवारण करण्यात येते. हे काम झालं कि आमचा मोर्चा आपोआप शिवथरघळकडे समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी वळतो.

विवारी शिवथरघळला जायला कधी जमत नाही.बहुतेक तो वार शनिवार किंवा सोमवार असाच असतो.या दिवशी घळीत फारशी गर्दी कधी जाणवली नाही. त्यामुळे अगदी निवांतपणे घळीचं दर्शन घेणं जमतं. मन कसं प्रसन्न होतं तिथल्या शांत शांत आणि थंडगार वातावरणामुळे. समर्थांनी तिनसाडेतिनशे वर्षापुर्वी या घळीत बसून दासबोधाचे लेखन केले.कसं केलं असेल हे सर्व ? दिव्याची व्यवस्था काय केली असावी ? त्याकाळी या जागी निबिड अरण्य असावे,वन्य पशुपक्षी यांचा वावर असावा. त्यांचा बंदोबस्त कसा केला असावा? असे अनेक प्रश्न मनात येतात.

सोळाशेसाठ प्रश्नांचं ओझं मनात घेऊन मी अनेकदा तेथे गेलो, आणि मग दरवेळी घळीत समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेऊन झाल्यावर जवळच असलेल्या मोठ्या सभाग्रहात जाऊन तेथे लावलेल्या फलकांचे मन लावून वाचन करु लागलो. हे असं नेहमीच घडत असे. इतकं प्रभावी असे त्या फलकावर काय आहे ? अस मनात येणं स्वाभाविक आहे.

न,मन एक करून ,अत्यंत एकाग्रचित्ताने मी दरवेळी त्या फलकावरील उपदेशरुपी लेखांचं वाचन करत असतो. त्यापैकी एक असतं ”घर असावे घरासारखे —-” या कवितेचं. पुण्याच्या विमल लिमये यांची ही कविता. मध्यंतरी ही कविता मी माझ्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना विरोपाने पाठवून दिली.या कवितेचा समावेश सुधाकरशेठ यांनी ”संस्कारधन” या पुस्तकात केला आहे.ते ही पुस्तके प्राथमिक,माध्यमिक शाळेतील मुलांना मोफत वाटत आहेत. अनायासे मुलांना आणि त्यांच्याबरोबर मोठ्यांनाही  “घर कसे असावे—“ याचा पाठ या संस्कारधनाच्या माध्यमातून मिळत आहे. या घरात नुसत्या भिंती नकोत तर तेथे जिव्हाळा,प्रेम सांभाळणारी नाती हवीत. अर्थपूर्ण बोलणं हवं. या घरात सुरेल गाणी असावीत, नुसती खुळखुळणारी नाणी नकोत तर त्याना स्वकष्टाचा,सदाचराचा सुगंध असावा, डोळ्यातून येणारे अश्रू हे नुसते नक्राश्रू नसावेत तर त्या अश्रूत खरीखुरी प्रीत असावी,जिव्हाळा असावा आणि या घरातून बाहेर पडणारे पिल्लु दिव्य शक्तियुक्त अशा स्वबळाने या जगात भरारी घेणारे असावं,घराचे नांव उज्ज्वल करणारं असावं,हरिभक्तपरायण असावं असं मोजकं मनोगत व्यक्त करणारी ही कविता मनाचा ठाव घेते. प्रत्येकाने आपल्या घरातील भिंतीवर आवर्जुन लावावी अशी ही संस्कारक्षम पवित्र कविता !

नाचे श्लोक अनेकदा वाचावेत,अनुभवावेत असेच आहेत. कसलाही संभ्रम असेल तर खुशाल मनाचे श्लोक वाचू लागा, मन शांत होईल. किंवा अजून काही अध्यात्मिक वाचन करा, मन आपोआप शांत होईल.
अगदी असाच संदेश देणारी “घरात काय असावे? “ ही दुसरी कविता येथे फलकावर झळकत आहे. या कवितेचा समावेशही [Arvind Nerkar’s]“संस्कारधन” या पुस्तकात सुधाकरशेठ यानी केला आहे. ही कविता कोणी लिहिली आहे त्यांचा उल्लेख येथे केलेला नाही. गेली अनेक वर्ष मी ती शिवथरघळ येथे पाहतोय.ही संपूर्ण कविता मी आपल्या माहितीसाठी देत आहे.
केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये
आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये॥धृ॥
येणार्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी
जाणार्याच्या मनात फिरुनी, येण्याविषयी ओढ हवी
ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वाहावा मनामध्ये॥१॥
लहान मोठी भांडी सारी, फिरत असती घरामध्ये
भांड्याला लागतेच भांडे, विसरूनी जावे क्षणामध्ये
परस्परांना समजून घ्यावे, अढी नसावी मनामध्ये॥२॥
नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या व्यक्तींची
ज्याची त्याला द्यावी जागा, वयाप्रमाणे मानाची
एकमताने निर्णय घ्यावा, नको दुरावा मनामध्ये॥३॥
लळा, जिव्हाळा आत असावा,नको उमाळा वरकरणी
नको कुणाला गर्व धनाचा,लीन रहावे प्रभुचरणी
दिवसा रात्री परमेशाचा ध्यास असावा घरामध्ये ॥४॥
मनाचे श्लोक पुढील दुव्यावरपण ऐकू शकाल. http://www.dhingana.com/search?q=manache+shlok&searchtype=album

—— home ! घर असावे घरासारखे ! वर टिप्पण्या बंद

वाहनांचे भोंगे-हॉर्न(HORN) म्हणजे ध्वनीप्रदूषण——!!

Posted in मराठीप्रेमी,social by savadhan on 20/06/2010
Tags: , ,

वाहनांचे भोंगे-हॉर्न(HORN) म्हणजे ध्वनीप्रदूषण——!!
भारतभर वेगळ्यावेगळ्या छोट्या मोठ्या गावातून हिंडलो,भटकलो तेव्हा उगीचच वाहनाचा भोंगा वाजवण्याची विकृती ही एक सर्वसामान्य समस्या असल्याचे दिसून आले.त्यातल्या त्यात वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न्स ! वास्तविकतः आपण हॉर्न न वाजवता रस्त्याने जाऊ शकतो, वाहन चालवू शकतो,याची जाणीवच वाहन चालकास नसल्याचे दिसून येते.मी गेली १८ वर्षे मोटरसायकल वापरत आहे पण मला कधीही अपवाद वगळता हॉर्न वाजवण्याची गरज पडली नाही.मुळात माझ्या मोटरसायकलचा टुर्रर्र—-असा वाजणारा बारीक आवाजातला हॉर्न फक्त मला आणि माझ्या आजूबाजूस दोन मिटर परीघातच ऐकू येणारा असल्याने मला तो वाजवण्याची इच्छा होत नसावी. पण हॉर्न न वाजवता मी जाऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे. मग इतरांनासुद्धा तसं जाणं का अशक्य असावं असा मला प्रश्न पडतो.जेव्हा मी रस्यावर वाहतुकीत अडकलेलो असतो तेव्हा इतर वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजत असतात ते पाहून त्यांची किंव येते,आणि मनात संतापही उफाळून येतो. आपल्या हॉर्नमुळे वाहतुकीची धीमी गती वाढणार नसते हे ठाऊक असूनही हेलोक हॉर्न वाजवून गोंधळात भरच घालत असतात याची या बहाद्दरांना जाणीवच नसते. कर्णकर्कश हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणे म्हणजे हा एक अपराध आहे असं मला वाटतं.
आपल्या आजूबाजूच्या लोकांना, पादचारी इसमांना, जनावरांना,इतर वाहनांना आपण आल्याचे कळावे, त्यांचे लक्ष वेधावे,त्यानी काळजी घ्यावी,आपला मार्ग निर्धोक करावा आणि आपल्याला आपल्या गतिने जाऊ द्यावे या हेतुने आपण हॉर्न वाजवतो.इथंपर्यंत सगळं ठिक आहे.पण पुढे काही कारणाने वाहतुक तुंबली असेल तर असं अनिर्बंधपणे दीर्घकाळ कर्णकटू हॉर्न वाजवण्याचे प्रयोजन काय?
पुण्यात मी गणेशमळा परीसरात राहतो.सिंहगड रस्ता आता बराच रूंद झाला आहे.या रस्यावरची वाहतुक अनेक पटीने वाढली आहे. [signal] हिरवा सिग्नल मिळण्याची वाट पाहणे याना कमीपणाचे वाटते की काय? देव जाणे ! या सिग्नलचा अर्थ काय असतो हे तरी याना ठाऊक असतं कां असा प्रश्न पडतो.वाहनासाठी लाल सिग्नल असला तरी सर्व बाजूने वाहने वेगाने हॉर्न वाजवत येत असतात.उलट दिशेने [रॉंग साईड]येणारी वाहने,सायकली, स्कूटर्स यामुळे सिग्नलला पादचारी मार्गावरून हा रस्ता ओलांडून पलीकडच्या बसथांब्यावर जायचे असेल तर एक दिव्य पार पाडण्यासारखे असते.कुत्री भुंकावीत तसे वाहनांचे हॉर्न्स पादचारी मंडळीवर सर्व बाजूनी भुंकत असतात.याला काय म्हणावे?
इतर देशात मात्र हॉर्न वाजवणे हे रानगट समजले जाते. कितीही वेगात वाहतुक असली, कितीही वाहनांची गर्दी असली तरी एखादा पादचारी रस्ता ओलांडत असेल तर सर्व वाहने शांतपणे थांबलेली असतात.रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या इसमास वाहन थांबवून सुहास्य वदनाने हात हालवून रस्ता ओलांडण्याची खूण करतात असा अनुभव मी न्युयॉर्क,सिंगापूर,थायलण्ड,मलेशिया या देशात घेतला आहे. मग येथेच असे कां? कोठे गेली इथली संस्कृती ?
रस्त्यावर ही अशी परिस्थिती मग इतर ठिकाणी तरी या महोदयांनी थोडी इतर नागरिकांची काळजी घ्यावी.पण तसे होताना दिसत नाही.आजारी,वयोवृद्ध,नुकतीच जन्मलेली बाळं, झाडावरील पक्षी अशाना या हॉर्नचा खूप त्रास होतो हे या महोदयांना का ठाऊक नसते? काही महाभाग सोसायटीच्या एखाद्या इमारतीसमोर उभे राहून कर्णकटू आवाजात दिवस-रात्र यावेळेचं कसलंही सोयरसूतक न पाळता हॉर्न वाजवण्याचे पातक नित्यनेमाने करत असतात.असं करणारे हे सारे इंजिनियर,अकौंटंट,सरकारी नोकर, व्यावसायिक असे साक्षर लोक असतात पण ते सुशिक्षित मात्र नसतात असं खेदाने म्हणावेसे वाटते.कां असं घडावं ? कोणी सांगू शकेल?आपल्या देशातील शिक्षणपद्धतीचं हे अपयश आहे असं म्हणता येईल का? घरातल्या संस्काराचे पण अपयश?
मध्य कर्णात आवाज पोचताच तो जवळजवळ २० पटीने मोठा होऊन ऐकायला येतो. हे ध्यानात घेता आपल्या कानावर ७० डीबीए पेक्षा जास्त पातळीचा आवाज सतत आठ तास पडला तर त्याचे गंभीर परीणाम आपल्याला भोगायला लागतात, हे आपल्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.[dbA link पहा] http://en.wikipedia.org/wiki/File:Audio23.jpg
] अशा सततच्या आवाजामुळे-
) कानाच्या आतल्या भागास दुरुस्त होऊ न शकणारी अशी कायमची इजा पोचते.
) आपली आवाज ऐकण्याच्या क्षमता कायमची उणावते,
) झोप लागेनासे होते,चिडचिड वाढते, वर्तनात बदल घडून येतो.कार्यक्षमता उणावते.
२) नाडीचे ठोके वाढतात,डोके दुखते,
३) ५ ते १० (एम एम एच जी) इतकी रक्तदाबात वाढ होते, छातीत कळा येऊ लागतात,
४) हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,
६) पशुपक्षांच्या वर्तनात बदल घडून येतो,त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परीणाम होतो.पर्यावरणावर वाईट परीणाम होतो.
इतके सारे वाईट परीणाम आपण आपल्या वर्तनाने ओढवून घेतो.[karmayog चा दुवा पहा. http://www.karmayog.org/noisepollution/58.htm%5D हे टाळण्यासाठी काही करता येणार नाही का?
होय, निश्चितपणे करता येईल असं मला वाटतं.
१] शक्य असल्यास कायदेशीरपणॆ कर्णकर्कश हॉर्नच्या उत्पादनावर बंदी घालणं. गुणवत्ता प्रमाणपत्राशिवाय उत्पादनास व विक्रीस बंदी घालणं.
२] दुचाकी,कार,रिक्षा,टेम्पॊ सारखी तिनचाकी-चारचाकी वाहने यांना असे कर्णकटू हॉर्न वापरण्यास बंदी घालणं
३] वाहन वापरण्याची परवानगी देण्यापूर्वी तपासणी करून असे हॉर्न वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेणे, प्रतिज्ञापत्राचा भंग झाल्यास त्यास इंधन न मिळण्याची व्यवस्था करणं. वाहनासह वाहन परवाना जप्त करणं, ड्रायव्हींग परवाना जप्त करणं,
४] दर ३-५ वर्षानी ड्रायव्हिंग परवानाधारकास सक्तिचे प्रशिक्षण देणे.आणि त्याची सांगड कायद्याने वाहनाच्या विम्याशी घालणं.त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाची नोंद त्याच्या परवान्यावर करणं इ. इत्यादी.
मी सुचवलेले उपाय १००% अमलात आणणे शक्य आहे असं मी म्हणत नाही, पण मग आपल्याला काही उपाय सुचतो ?
[ For additional information 1] http://en.wikipedia.org/wiki/File:Audio23.jpg
2] http://en.wikipedia.org/wiki/File:Ath-byage.png 3] ] http://timesofindia.indiatimes.com/articleshow/4522168.cms —-driver suspended for honking at Chennai 4] http://mohanbn.com/blog/?p=1115 – why do you honk horn ?
5]http://www.photobesity.com/1990/08/cell-phone-wuile-driving-bad-idea.html

वाहनांचे भोंगे-हॉर्न(HORN) म्हणजे ध्वनीप्रदूषण——!! वर टिप्पण्या बंद

अर्धनारी नटेश्वराची जाणीव !

Posted in मराठीप्रेमी,social by savadhan on 14/06/2010
Tags: , ,

अर्धनारी नटेश्वराची जाणीव !
”स्त्रीहृदयाचा सहजभाव वात्सल्य! वात्सल्याचा रंग शुभ्र ! वात्सल्यातच प्रेम—आदी विविध भावना— शृंगरादी सगळे रस अंतर्भूत असतात–इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे! पतिप्रेम ही त्यातलीच एक सर्वश्रेष्ठ आणि नैसर्गिक भावना !
पुरुषाला स्त्रीकडून धीर मिळवावा लागतो,आणि स्त्रीला पुरुषाचा आधार लागतो .म्हणून तर “अर्धनारीनटेश्वर हे देवाचे आणि त्याने निर्माण केलेल्या माणसाचे खरे —मूळ भावनिक रूप! —-मग स्त्रीपुरुषांची भांडणे ? हे मूळ रुप न ओळखल्या मुळे—! पुरुषापासून स्त्रीला धोका –? या मूळ रुपाची जाणीव नसल्यामुळे !—–शॄंगाररसाने मन फुलते—– बीभत्सरसाने करपून–जळून जाते—! ”(संदर्भ: तपस्या-सुमती क्षेत्रमाडे.)
स्त्रीपुरुषांची भांडणे कां ते सुमतीबाईनी किती स्पष्टपणे नोंदवलंय ? स्त्रीला पुरुषांपासून धोका कां ? तर हे मूळ रूप —अर्धनारीनटेश्वराचे -न ओळखल्यामुळे ! पण कॊणी ? स्त्रीनं की पुरुषानं? या मूळ रूपाची जाणीव कुणाला होत नसावी? हे मूळ भावनिक रूप का जाणवत नसावं? असले प्रश्न मनात उगीचच रुंजी घालतात ? असं कां व्हावं? कां एव्हढा कल्लॊळ ऊठावा मनात?
माझं बालपण खॆड्यात गेलेलं. बालपणी म्हणजे ५०-५५ वर्षापूर्वी रेडीऒसुद्धा नव्हता त्यावेळी मनोरंजनासाठी. गावातील संगीतप्रेमी मंडळी संध्याकाळी भजन नाहीतर भेदिक गाणी म्हणायची. रात्री उशीरापर्यंत ही गाणी चालायची.रात्रीच्या निरव शांततेत ही गाणी लांबपर्यंत ऐकायला यायची.या गाण्याच्या माध्यमातून जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं जायचं. अशाच एका भेदिक गाण्यातील मथितार्थ मला यावेळी आठवतोय.” स्त्री आणि पुरूष ही या संसारगाड्याची दोन चाकं असून ती सारख्या अंतरावरून समान गतीने गेली तरच हा संसार सुखाचा होईल . ही दोन्हीही चाकं महत्वाची आहेत. यात कोणी श्रेष्ट नाही कोणी कनिष्ट नाही. स्त्री-पुरुष दोघेही मुक्त ,दोघेही स्वतंत्र पण दोघेही एका भावनिक बंधनात ” याद्वारे ऐकणार्याला अगदी सहजपणे संदेश दिला जायचा नि जनमानसाच्या मनावर सहजपणे कोरलाही जायचा. स्त्री आणी पुरूष याना एकमेकांची जरूरी आहे. एकमेकांची साथ आवश्यक आहे , त्याशिवाय हा संसार तरून जाता येणं अशक्य आहे. अशा प्रकारच्या भेदिक गाण्यातून त्या भावनिक रुपाची –अर्धनारीनटेश्वराची –जाणीव दोघा स्त्री-पुरुषांना होत असे. अशी अनेक जोडपी गुण्यागोविंदाने आणि उत्कटपणे आपला संसार हाकत असल्याचं माझ्या पाहण्यात आलंय.पती आणि पत्नी एकाच नाण्याच्या दोन बाजूच जणू काही.स्त्रीकडून धीर आणी पुरुषाचा आधार सुखी संसारासाठी आणि हा भवसागर तरून जाण्यासाठी आवश्यक. मला या क्षणी ”साधी माणसं” या चित्रपटातील ”ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे—–,आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूदे—!!” या सुप्रसिद्ध गीताची आठवण होतेय. त्या चित्रपटातील लोहारणीचं आणि लोहराचं पती-पत्नीच्या नात्यांनं एकमेकावर निस्सिम प्रेम आहे . पण ऐरण रुपी देवाला येथे ती अथांग मायेची पखरण आमच्या संसारावर राहूदे अशी मागणी करतेय !
स्त्रीहृदयाचा सहजभाव वात्सल्य ! आपल्या बाळावर स्त्री आई म्हणून वात्सल्याचा वर्षाव करते. हे वात्सल्य निरपेक्ष असते. यात त्या बाळाकडून त्या मातेस कसलीही अपेक्षा नसते. माझं बाळ निरोगी राहावं, मोठं व्हावं, खेळावं ,बागडावं एवढीच त्या माऊलीची अपेक्षा ! त्याच्यासाठी ती स्वतःचा प्राणही पणाला लावायला तयार असते. बाळाच्या ओढीने काळोख्या रात्री अत्यंत अवघड असा कडा उतरण्याचे दिव्य हिरकणी पार पाडते , म्हणूनच हिरकणीच्या नावाने तो अवघड कडा प्रसिद्ध पावतो. श्यामची आई, विनूची आई ही वात्सल्य, करूणा,जिव्हाळा,मातृभक्ती,राष्ट्रभक्तीच्या संस्काराची प्रत्यक्ष प्रतीकं होत. माता आपल्या बाळात बाळकृष्णाच्या लीला अनुभवत असते. हे वात्सल्य, माया,भक्ती, हा उत्कट जिव्हाळा, विश्वात जेथे जेथे आढळतो ती व्यक्ती माऊलीरुपच होऊन जाते ! म्हणूनज्ञानेश्वर महाराज हे सार्या भागवतसंप्रदायी मंडळींची ज्ञानोबा-माऊली होतात. आणि म्हणूनच ” ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम” असा अखंडित घोष महाराष्ट्रभर सर्वत्र दुमदुमत असल्याचे अनुभवास येते.
वात्सल्य, माया,जिव्हाळा,भक्ती ,प्रेम अशी ही एकाच भावनेची रुपं ! आईचं वात्सल्य,भावा-बहिणींची माया,वडिलांचा जिव्हाळा, भक्तांची भक्ती,प्रियकर-प्रेयसीचं प्रेम अशी या भावनेची विविध प्रतीकं ! ही भावना बिभत्स होणार नाही याची जाणिवपूर्वक जपणूक म्हणजे अर्धनारी नटेश्वराची उपासना ! भारतीय संस्कृति मध्ये भावाबहिणीचं नातंही एक उत्कट नातं समजलं जातं ! हे नातं अत्यंत पवित्र समजलं जातं ! येथे वासनेला थारा नसतो,तर भावाचे बहिणीवर आणि बहिणीची भावावर नितांत आणि निरपेक्ष अशी माया असते. अशी ही बहिण आपल्या भावासाठी स्वतःचे मूत्रपिंड सहज दान करते असं चित्र दिसतं ! तिच बहिण ” सोनियाच्या ताटी,उजळल्या ज्योती,ओवाळते भाऊराया ,वेड्याबहिणीची वेडी ही माया” अशी साद घालते. तर भाऊ आपल्या बहिणीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावायला तयार असतो , अशी कितीतरी उदाहरणं भारतीय समाजात पहायला मिळतात. अहो, एखाद्या दरोडेखोरास एखाद्या माऊलीने भाऊराया म्हणून साद घातली तर तो त्या शब्दाला जागत असे, त्या माऊलीस बहिण मानून अभय देत असे, अशी कित्येक उदाहरणं महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदली गेली आहेत.असा आहे महिमा या भावा बहिणीच्या मायेचा ! अर्धनारीनटेश्वराची अशी अनेक रुपं अनुभवायला मिळतात या भारतीय संस्कृतीमध्ये ! पण अलिकडच्या काळात पाश्चात्यांच्या प्रभावामुळे भारतीय संस्कृतीस झळ पोचलीय असं जाणवू लागलंय ! ते त्यांनी आखलेल्या खास धोरणामुळे ! दोन फ़ेब्रु.१८३५ ला ब्रिटीश पार्लमेंटमध्ये लॉर्ड(?) मेकॉले  म्हणाला होता– “I have traveled across the Length & Breadth of India & I haven’t seen a single person who is a beggar, who is a thief, such wealth I have seen in this country, such high moral values, people on such caliber that I don’t think we would ever conquer this country unless we break the back bone of this nation which is Spiritual & Cultural Heritage and Therefore , I propose that we replace her old & ancient education system, her culture for if the Indians think that all that is foreign & English is good & greater than own(?), they will lose their self esteem, their native culture and they will become that we want them a truly Dominated Nation. [Readers are requested to provide reference for this quote]” दोनशे वर्षापूर्वी आखलेल्या या धोरणाची परिणती म्हणून आज आपण संपृर्ण नितीमत्ता हरवून बसण्याच्या मार्गावर आहोत. या बदलाचं उत्तम चित्रण मालगुडी डेज मधल्या मिठाईवाला कथेत केलेलं आढळतं.पती-पत्नीचं प्रेम,बंधुप्रेम,पुत्रप्रेम,राष्ट्रभक्ती,कौटुंबिक जिव्हाळा आणि विरक्तीचे व निर्लोभी वृत्तीचे दर्शन मिठाईवाल्याच्या जीवनात दिसून येतं तर त्याचा मुलगा माली हा अमेरिकन ललनेशी मोटारीत प्रेमाचे चाळे करत असल्याचे दाखवून बिभत्सतेचं दर्शन घडते. आजच्या शिक्षण पद्धतीचं हे फार मोठं अपयश आहे असं मला वाटतं. आजच्या शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होण्याऐवजी तो रानटी बनत चालला आहे काय याचा शोध घेणं आवश्यक आहे.पत्नीच्या निधनानंतर मिठाईवाला पुढील सारं आयुष्य एकाकी आणि व्रतस्थ वृत्तीने राहून लहानग्या मुलाचे तो संगोपन करतो.समाजातल्या अशा अनेक विधुरांचे प्रतीक म्हणजे हा मिठाईवाला होय. ऊत्तम संस्कार हे भारतीय संस्कृतीचं बलस्थान आहे पण तेच कमकुवत होत आहे की काय असा प्रश्न माझ्या मनात वारंवार येतोय. आणि हेच त्या कल्लोळाचं कारण असावं !
भारतीय संस्कृति ही निस्सिम त्यागावर आधारलेली आहे. भूक लागली असता खाणं ही प्रकृति,भूक लागली नसता खाणं म्हणजे विकृती तर भूक लागली असता आपल्या ताटातील अर्धी भाकर भुकेल्याला देण्याची वृत्ती असणं ही संस्कृति असं समजलं जातं आणि ती जाणीवपूर्वक जोपासली जाते. हे तत्त्व जीवनाच्या इतर व्यवहारातही सदोदीत पाळलं जाणं म्हणजेच अर्धनारी नटेश्वराची जाणीव असणं असं तर नव्हे? होय ! मला तर असंच वाटतं ! निकोप समाजाचा आणि आनंदी जीवनाचा हाच खरा राजमार्ग होय !!

अर्धनारी नटेश्वराची जाणीव ! वर टिप्पण्या बंद

अमेरिकन महिलांचा हक्कासाठीचा लढा .

Posted in मराठीप्रेमी,social by savadhan on 14/05/2010
Tags: , ,

अमेरिकन महिलांचा हक्कासाठीचा लढा –महत्वाचे मुद्दे
अमेरिकन महिलांना जवळ जवळ दोनशे वर्षाच्या लढ्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य आणि हक्क याची माहिती येथे दिली आहे. शंभर वर्षापूर्वी महिलांवर अनेक बंधने होती त्या मानाने आज रोजी अमेरिकन महिलांना कल्पनातीत अशा अनेक हक्काच्या संधींचा आणि स्वातंत्र्याचा लाभ झाला आहे. त्याचा फायदा जगातील इतर राष्ट्रातील महिलांना पण झाला.अमेरिकन महिलांना काय आणि कुठल्या प्रकारचे हक्क मिळाले आहेत ते जाणून घेणे महत्वाचे आहे असे मला वाटते. जिज्ञासूनी अधिक माहितीसाठी ERAवाचावे .एलिस पॉल नावाच्या कायदेतज्ञ असलेल्या महिला संघटनेच्या नेत्याने पहिल्यांदा १९२३ साली ERA चा मसूदा लिहून तो कॉंग्रेस समोर विचारासाठी सादर केला.शेवटी २२मार्च १९७२ ला सिनेटसह प्रतिनिधीगृहाची २/३ बहुमताने मंजूरी मिळाली आणि हा मसूदा इतर राज्यांच्या मंजूरीसाठी पाठवून देण्यात आला.यासाठी सात वर्षाची दिलेली मुदत ३०जून १९८२ पर्यंत वाढवून दिली तेव्हा घटनेनुसार ३/४ म्हणजे ३८ राज्यांऐवजी ३५ च राज्यांनी या मसूद्यास मंजूरी दिलेली असल्याने याचा समावेश अद्याप अमेरिकेच्या घटनेत झालेला नाही. या ERA ने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विषमलिंगी विवाहाप्रमाणेच समलिंगी विवाहास कायद्याने संमती, अविवाहित महिलेस हवे असल्यास कायद्याने अपत्य प्राप्तीचा हक्क इ.इ.१९८२ पासून कॉंग्रेसच्या प्रत्येक सभेसमोर ERA पुन:विचारार्थ ठेवण्यात आले.२००७-०८ च्या ११० व्या सभेनंतर आता २००९-१० च्या १११व्या सभेसमोर ते पुनः विचार विनिमयासाठी येण्याची अपेक्षा आहे. खाली एकेका मुद्यावर संक्षिप्त टिपणी देत आहे.
१] ४ जून १९१९ ला अमेरिकन कॉंग्रेसने १९ व्या राज्यघटना दुरूस्तीने अमेरिकन महिलांना मतदानाचा हक्क प्राप्त करून दिला.
{भारतीय महिलांना सुद्धा आजरोजी मतदानाचा हक्क आहे. मात्र भारतातील महिलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ ५०% असूनही संसदेत तेवढे प्रतिनिधीत्व तर सोडाच पण ३३% [ हा आकडा कुठून आणला ते मला ठाऊक नाही ] प्रतिनिधीत्व देण्यातही अनेक अडथळे निर्माण केले जात आहेत.} अमेरिकेतील महिलांना संसदेत किती टक्के प्रतिनिधीत्वाचा हक्क आहे ते येथे नमूद केलेले नाही.
२] अमेरिकन महिलांना पुरूषांच्या बरोबरीने म्हणजे पुरुषांइतकेच वेतन घेण्याचा हक्क कायद्याने दिला आहे.लिंगावर आधारीत वेतनात भेदभावास आता प्रतिबंध करण्यात आला आहे. १९३८ च्या फ़ेअर लेबर स्टॅंडर्ड ऍक्ट ने स्त्री-पुरुषांना किमान वेतनाची हमी दिली आहे. आणि म्हणूनच इक्वल राईट्स अमेंडमेंट्स ला स्री-पुरुष समानता दाखवण्यासाठी Women’s Equality Amendment असंही म्हंटलं जातं.
[भारतात समान काम समान वेतन कायदा आहे. तसेच भारतीय महिलांना आयकरातही विशेष सवलत मिळत आहे. ]
३] जे काम पुरुष करतात ते काम करण्याचा हक्क १९६४ च्या सिविल राईट्स् ऍक्ट ने अमेरिकन महिलांना मिळालेला आहे. तसेच नोकरभरतीसाठी लिंगाधारीत जाहिराती देणे बेकायदेशीर समजण्यात येत आहे.
[ भारतातही कोणत्याही नोकरीसाठी स्त्रियांना अपात्र समजण्यात येत नाही किंवा नाकारण्यात येत नाही.बस चालक,बसवाहक,रिक्षाचालक,पोस्टवुमन,अभियंता,इ. अशा विविध सेवासाठी स्त्रियांची निवड होत आहे. ]
४] महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा हक्क अमेरीकन महिलांना मिळाला आहे. १८७० मध्ये अमेरिकेत एकूण संख्येच्या २० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थिनी होत्या आज रोजी त्यांची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे.
[ भारतात ही महाविद्यालयीन मुलींची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते,गेल्या दोन दशकांत त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून येते.]
५] विवाहोत्तर धर्म निवडीचे स्वातंत्र्य अमेरीकन महिलांना मिळाले आहे. पूर्वी ज्या पुरूषाबरोबर विवाह होई त्या पुरुषाचा जो धर्म असेल तोच धर्म त्या महिलेस निर्विवादपणे आपोआप स्वीकारावा लागे.
[ भारतीय महिलांना ही मुभा आहे.आंतरधर्मीय विवाहानंतर पुरुषाचा जो धर्म असेल त्या धर्माच्या चालीरीतीशी त्या विवाहित महिलेस समन्वय साधणे भाग पडते असे प्रत्यक्ष अनुभवास येते.]
६] स्वतःची स्थावर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार अमेरीकन महिलांना कायद्याने मिळालेला आहे. इ.स.१८०० च्या दरम्यान पतिच्या परवानगीशिवाय अशी मालमत्ता धारण करता येत नसे.
[ भारतात महिलांना कायद्याने वारसाहक्काने स्थावर मालमत्तेत योग्य हिस्सा मिळण्य़ाचा अधिकार मिळाला आहे.तसेच स्वकष्टाने मालमत्ता धारण करण्याचाही हक्क आहे.]
७] १९७८ च्या प्रेग्नंसी डिस्क्रिमिनेशन ऍक्ट नुसार गरोदर असलेल्या किंवा गर्भसंभव असलेल्या अमेरिकन महिलांना नोकरीतील बढतीची संधी नाकारण्यास किंवा नोकरी नाकारण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच गरॊदर स्त्रियांनी गरोदरपणात सक्षमपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना गरोदरपणाच्या रजेची सक्ती करता येणार नाही.सद्या अमेरिकेत तीन महिने पगारी प्रसुती रजा मिळते.
[भारतातील महिलांना सुद्धा ह्या सवलतींचा फायदा मिळत आहे.अभियांत्रिकी,वैद्यकीय,सेनादले,प्रशासकीय सेवा,शिक्षणसंस्था अशा सर्व ठिकाणी भारतीय महिला सक्षमपणे कार्यरत आहेत.]
८] अवांछित संतती होऊ द्यायची किंवा नाही याबाबत निर्णय घेणाचा हक्क अमेरिकन महिलांना आहे.त्यासाठी आवश्यक असणार्या गर्भनिरोधक गोळ्या, औषधे घेण्याचा, गर्भपाताचा निर्णय घेण्याचा हक्क त्याना आहे.
[ भारतात आजही कायद्याने हे सर्व हक्क भारतीय महिलांना आहेत परंतु सामाजिक आणि कौटुम्बिक दबावाखाली भारतीय स्त्रिया याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत असे अनुभवास येते.आजही असंस्कृत कुटुंबात संततीबाबतचे सर्व निर्णय कुटुंबातील इतर लोकच घेतात, त्यामुळे स्त्री-भ्रूण हत्येचे अनेक प्रकार राजरोसपणे घडतात.आता याविषयी कायद्याची बंधने कठोरपणे पाळण्यात येत आहेत.त्यामुळे अशा प्रकारास थोडाफार आळा बसला आहे असे वाटते. ]
९] इच्छा नसेल तर आपल्या पतीबरोबर समागमास नकार देण्याचा हक्क अमेरिकन महिलेस १९७६ नंतर मिळाला.तत्पुर्वी अशा प्रकारचा हक्क त्यांना नव्हता. आजारपणासारख्या काही कारणाने इच्छा नसल्यास समागमाची जबरदस्ती अमेरिकन महिलांवर होत असावी असे वाटते.आता अशा समागमास [ज्यास rape हा शब्द योजला आहे]या कायद्यान्वये प्रतिबंध करण्यात आला असून अमेरिकन महिलांना या कायद्याने संरक्षण दिले आहे.
[भारतातील सुसंस्कृत एकत्र कुटुंबात महिलांना अनेक धार्मिक बंधनाचं पालन करावं लागत असे तसंच ते पुरुषांनाही करावे लागत असे. त्यामुळे अनैच्छिक समागमाचा प्रसंग येत नसे. समागम हा विधीवत आनंदाने करावयाचे आचरण असून तसे संस्कार उभयतांवर झालेले असत.
आता सामाजिक परिस्थिती खूपच बदललेली आहे.आर्थिक,धार्मिक वा अन्य कौटुंबिक कारणामुळे [विभक्त] कुटुंबातील पती-पत्नीमध्ये मतभेद झाल्यास कुटुंबकलहास सुरुवात होते.अशावेळी पत्निची इच्छा नसताना पतीने समागमाची इच्छा व्यक्त केल्यास तिला त्या लैंगिक संबंधास कायद्याने नकार देण्याचा अधिकार असेल मात्र त्यामुळे कलह वाढत जाऊन त्याची परीणती विवाहविच्छेदनात होण्याचीच शक्यता जास्त होईल. (पुर्वीच्या मानाने अलिकडे घटस्फोटाच्या संख्येत वाढ झालीआहे.)भारतीय दंडसंहितेमधील कलम ३७५ पतीपत्नीच्या संबंधास लागू होईल का किंवा त्यासाठी वेगळी अशी तरतूद आहे काय ते पहावे लागेल. जिज्ञासूनी बलात्कार याविषयी लिहिलेला लेख अवश्य पहावा. या ठिकाणी याविषयी तपशीलवार चर्चा अपेक्षित नाही.]

Kiberia Yethe mahilanchi kay avastha aahe te paha .

http://www.amnesty.org/en/news-and-updates/video-and-audio/video-women-kibera-kenya-20090306

अमेरिकन महिलांचा हक्कासाठीचा लढा . वर टिप्पण्या बंद

या भारत देशाला वाचवणारा कोणी आहे का?

या भारत देशाला वाचवणारा कोणी आहे का?
आज रोजच्या प्रमाणे विरोप पहात होतो त्यात एका विरोपाने विचार करायला भाग पाडलं. हा विरोप जरा वेगळ्याच विषयावर होता. त्याचं नाव होतं इंडिया गरीब आहे कां ? अशा अर्थाचं . पण संदर्भ होता स्विस बॅंकेतील पैशाचा. त्यात विरोप लिहिणारा लिहितो की जर ऑलिंपिकमध्ये काळा पैशाच्या ठेवीची स्पर्धा असती तर भारताने हातोहात सुवर्ण पदक जिंकलं असतं, आणि दुसर्या क्रमांकावर रशिया आला असता.
हे वाचून कोणाचंही डोकं गरगरायला लागलं असतं. अशीच या विरोपातील माहिती आहे. पण सामान्य माणूस काय करू शकतो. तरीसुद्धा ही माहिती सर्वसामान्यापर्यंत पोचवली पाहिजे असं मला वाटलं.
आंतर्राष्ट्रीय दबावामुळे स्विस सरकारने , संबंधीत ठेवीदाराच्या देशाने मागणी केली तर त्यांची नावे जाहीर करण्याचे नुकतेच मान्य केले आहे. असं असूनही भारत सरकार मात्र अशा ठेवीदारांचा तपशील का विचारत नाही हा एक गहन प्रश्न आहे. स्विस बँकेतील इतर सर्व देशांच्या काळ्या पैशाच्या ठेवीच्या एकूण बेरजेपेक्षा जास्त इतका काळा पैसा ठेवीच्या रुपाने स्विस बँकेत आहे. असं जर असेल तर आपण भारताचे नागरीक या नात्यांने या संबंधात काय करू शकतो ते तपासणे आवश्यक आहे.
सदर विरोपात पुढे म्हंटले आहे की सरकारवर दबाव येण्यासाठी भारतीय नागरीकांनी एक चळवळ उभारली पाहिजे,आणि भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी मिळालेल्या या सुवर्णसंधीचा फायदा घेतला पाहिजे.
वाचकांनो हे वाचा , आणि जास्तीत जास्त भारतीयांना याविषयी माहिती द्या. याविरोधात एक जबरदस्त चळवळ उभी करूया आणि सुस्त सरकारला कृतीसाठी जागे करूया.असं आवाहन ही पुढे तो करतोय.
भारत हा एक गरीब देश आहे असं कॊण म्हणतं ? या देशातले भ्रष्ट राजकारणी, भ्रष्टाचारी प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्यांनी परदेशी बँकांमधून, त्यांच्या बेकायदेशीर खात्यात जवळजवळ १५००बिलियन डॉलरची, अफरातफर केलेली रक्कम ठेवलेली आहे. ही रक्कम या देशाच्या परदेशाकडून घेतलेल्या कर्जाच्या १३ पटीपेक्षा जास्त आहे. हा काळा पैसा या चोरांनी भारतीय जनतेस लुटून आणि फसवून मिळवलेला आहे. जर हा प्रचंड काळा पैसा भारतात परत आला तर चोवीस तासात भारत कर्जमुक्त तर होईलच पण घेतलेल्या कर्जाच्या १२ पट रक्कम शिल्लक राहील असा तज्ञांचा कयास आहे. हि रक्कम गुंतवून भारत सरकारच्या वार्षिक बजेट इतकं व्याज मिळू शकेल. तसेच सगळे टॅक्सेस जरी रद्द करण्यात आले तरी या रकमेच्या सहाय्याने शासन व्यवस्थित चालू शकेल.हे सगळं वाचल्यावर हा देश गरीब आहे असं आपल्याला वाटतय का?
दरवर्षी जवळ जवळ ८०हजार लोक स्वित्झर्लंडला जातात. पैकी २५हजार वारंवार जातात ते कशासाठी ? हौशी प्रवासी म्हणून ? अजिबात नाही. जरा ही माहिती वाचा. अप्रामाणिक उद्योजक, राजकारणी,भ्रष्ट अधिकारी, क्रिकेट खेळाडू,भ्रष्ट अभिनेते,बेकायदेशीर वेश्याव्यावसायिक आणि संरक्षित-वन्यजीव व्यापारी यानी, जळवा जसं रक्तशोषण करतात तसं या भारतभूमीच्या संपत्तीचं आणि वैभवाचं शोषण केलं आहे. हे चित्र आहे फक्त स्विस बँकेतील ठेवीचं. इतर परदेशी बँकांचा आपण विचारच केलेला नाही.
स्विस बँकींग असोशियनच्या २००६च्या अहवालानुसार स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा १४५६ बिलियन डॉलर्स, रशिया ४७० बिलियन डॉलर्स, यु.के ३९० बि.डॉ, युक्रेन १०० बि.डॉ. तर चीन ९६ बि.डॉ.असा आहे. इतर सगळ्या देशाच्या दीडपट इतका काळा पैसा, १९४७ पासून या देशवासीयाना गरीबीच्या खाईत लोटून स्वतःची तुंबडी भरून आणि लुटून नेलेला भारतीयांचा पैसा स्विस बँकेत पडून आहे. वाचकांनो आपणच हिशोब करा ! ही रक्कम आपण परत आणू शकतो काय ?

kripaya hi link paha-1]http://www.yoindia.com/shayariadab/chit-chat-general-discussion/swiss-bank-and-indias-black-money-t55170.0.html

2]http://wiki.answers.com/Q/Total_black_money_in_India

या भारत देशाला वाचवणारा कोणी आहे का? वर टिप्पण्या बंद

विद्युत कायद्यातील काही व्याख्यांचा आढावा.

विद्युत कायद्यातील व्याख्या
२००३ च्या विद्युत कायद्यातील तरतुदींचा थोडक्यात आढावा .
२००३ चा विद्युत कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी भारतीय विद्युत कायदा १९१० मधील तरतुदीनुसार आणि त्याखाली तयार करण्यात आलेली १९५६ ची भारतीय विद्युत नियमावली इ.नुसार विजेच्या संदर्भातील कामकाज चालत असे. भारत स्वतंत्र झाला इ.स.१९४७ ला पण इ.स.२००३ उजाडले तरी अजूनही १९१० चाच कायदा वापरात होता. विजेची गरज वाढत चालली होती,त्याप्रमाणात मागणी पण वाढत चालली होती.ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाबरोबरच सर्वत्र वीजपुरवठा व्हावा, विद्युत उद्योगाच्या विकासास मदत व्हावी म्हणून चालना देण्याच्या उद्देशापोटी,विद्युत निर्मिती,विद्युत वहन,विद्युत वितरण आणि विजेचा वापर व विद्युत-व्यावसायिक व्यापार याबाबतच्या कायद्याचे, नियमावलींचे एकत्रीकरण करणे आवश्यक वाटू लागले होते. त्याअनुषंगाने वीजदराची तर्कनिष्ठ पुनर्रचना करण्याचा,सब्सिडीच्या बाबतीत पारदर्शक धोरणाची खात्री देण्याचा, पर्यावरणानुकूल कार्यक्षम धोरणास प्रोत्साहन देण्याचा,केंद्रीय विद्युत प्राधिकरण गठित करण्याचा, विद्युत नियामक आयोगाच्या स्थापनेचा आणि याचिका-लवादाच्या (अपेलेट ट्रायब्युनल) आस्थापनेविषयीचे विचार प्राधान्यक्रमाने समोर आले.
विद्युत कायदा २००३ मध्ये वरील विचाराच्या अनुषंगाने भारतीय विद्युत कायदा १९१०,विद्युत (पुरवठा) अधिनियम १९४८ आणि विद्युत नियामक आयोग अधिनियम १९९८ चे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. सर्वसामान्य माणसास वीजेसंदर्भातील वेगवेगळ्या कायद्यासाठी विनाकारण इकडेतिकडे भटकावे लागू नये या उद्देशाने २००३चा कायदा साधा नि तर्कनिष्ठ करण्यात आला आहे असे दिसून येते.
२००३चा विद्युत कायदा हा एकूण १८ भागात व १८५ कलमात विभागला असून या कायद्याच्या १ल्या भागात कायद्याचे नांव आणि या कायद्यात वापरलेल्या अनेक महत्वाच्या विद्युत संकल्पनाच्या स्पष्टीकरणासाठी त्यांच्या व्याख्या देण्यात आल्या आहेत. एखाद्या शब्दसंचाचा शब्दकोषात जरी काही अर्थ दिलेला असला तरी कायदेशीरदृष्ट्या येथे दिलेल्या व्याख्येनुसारच त्या त्या बाबींचा अर्थ समजण्यात येतो हे आपण ध्यानात घेणे आवश्यक असते. कलम १ नुसार या कायद्याचे नांव ” विद्युत अधिनियम (कायदा) २००३ असे आहे.या आधीच्या कायद्याचे “भारतीय विद्युत अधिनियम १९१०” असे नाव होते. त्यातील ’भारतीय” हा शब्द जाणीवपूर्वक गाळण्यात आला आहे, हे ध्यानात घ्यावे.जो कायदा भारतीयांनी, भारतीयांसाठी, भारतीय संसदेने मंजूर केला आहे त्याला “भारतीय” असे संबोधण्याचे प्रयोजन नाही.मात्र हा कायदा “जम्मू-काश्मिर” वगळून उर्वरीत भारतासाठी लागू होईल असे ही येथे नमूद केले आहे.
कलम २ मध्ये एकूण ७७ बाबींच्या व्याख्या दिलेल्या आहेत.नमुन्य़ादाखल काही व्याख्या आपण येथे पाहणार आहोत.[कंसात कलम-उपकलम क्र.नमूद केला आहे]
[२(८)] “स्वांतसुखाय विद्युत निर्मिती यंत्र”[ कॅप्टीव जनरेटींग प्लॅंट]:- केवळ स्वतःच्या उपयोगासाठी विद्युत निर्मिती करण्याकरीता उभारलेला विद्युत जनित्र संच. एखाद्या सहकारी संस्थेने त्याच संस्थेच्या सभासदांच्या वापरासाठीच हा जनित्र संच प्रामुख्याने वीज निर्मिती करेल.अशा प्रकारच्या तरतूदीमुळेच मी याला “स्वांतसुखाय” असा शब्द योजला आहे, आणि तो जास्त समर्पक असाच आहे. पुढे ८ जून २००५ ला याबाबत एक स्पष्टीकरण देण्यात आले. वापरकर्त्या सदस्यांची जनित्र संचात किमान २६ टक्के मालकी हक्क असला पाहिजे आणि दरवर्षी एकूण उत्पादन केलेल्या विद्युत उर्जेच्या किमान ५१ टक्के वीजेचा वापर स्वतः सदस्यानी केला पाहिजे. असे असेल तरच त्यास “स्वांतसुखाय” (कॅप्टीव) समजण्यात येईल. [म्हणजेच ७४ टक्के भांडवल इतर वैध मार्गाने उभारुन आणि प्रचलित नियमानुसार ४९टक्के निर्मित-वीज वीजकंपनीस देऊन एखादी संस्था कॅप्टीव जनरेटींग प्लॅंट बाळगू शकेल अशी तरतूद त्यावेळी केलेली होती.]
२(१२) [को-जनरेशन]-सहनिर्मिती :-एकाच प्रक्रिये दरम्यान वीजनिर्मितीसह किंवा वीजनिर्मितीशिवाय एकाचवेळी दोन किंवा दोनपेक्षा अधिक ’उपयुक्त-उर्जेची’ निर्मिती होत असेल तेव्हाच या प्रक्रियेत “सहनिर्मिती” होत आहे असे समजावे.
२(१४) [कॉन्झरवेशन]-“उर्जा-संतुलन” :-विद्युत उर्जेचा संतुलित वापर व्हावा म्हणून वीजवापराची किंवा वीजपुरवठ्याची कार्यक्षमता वाढवल्यामुळे वीजेच्या खपात होणार्‍या घटीस “उर्जा-संतुलन” असे समजावे.
२(१५) ग्राहक:-ग्राहक कुणाला म्हणावे ते या व्याख्येने स्पष्ट केले आहे. शासनाने किंवा अनुज्ञाप्तीधारक कंपनीने किंवा या कायद्यानुसार वीजपुरवठा करण्याचा व्यवसाय करणार्‍या कोणाही व्यक्तीने किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वये वीजपुरवठा वापरणारी व्यक्ती किंवा इतर कोणीही व्यक्ती, जिच्या संचमांडणीस वीज पुरवठा करण्यासाठी ती संचमांडणी शासनाच्या किंवा वीजकंपनीच्या वीजपुरवठासंचास जोडली असेल, अशी त्या संचमांडणीची उपभोक्ती व्यक्ती होय. [म्हणजे ती संचमांडणी ज्या व्यक्तीच्या ताब्यात असेल, जी त्याचा उपभोग घेत असेल मग ती मालक असेल किंवा भाडेकरू असेल तरी ती ग्राहक असेल असा याचा अर्थ होतो.]
२(१९)[डिस्ट्रीब्युशन सिस्टिम]-वितरण प्रणाली :- पारॆषण (ट्रॅन्समिशन) वाहकावरील वीजवितरणाचा बिंदू किंवा वीजनिर्मिती केंद्रास जोडण्याचा बिंदू आणि ग्राहक-संचमांडणीचा आरंभ बिंदू यास जोडावयाच्या इतर सुविधेसह असणारी वायर-प्रणाली होय.
[आपण रोजच्या व्यवहारात पारेषण, वीजवितरणाचा बिंदू (डिलिवरी पॉईंट्स), सुविधा (फॅसिलिटीज) या तांत्रिक शब्दांचा आवर्जुन उपयोग केला तर या व्याख्या समजण्यात अडचण येणार नाही.अन्यथा हे सर्व अगम्य आणि बोजड वाटण्याचा संभव असतो.]
२(२०)[इलेक्ट्रीक लाइन]-विद्युत वाहिनी:- कोणत्याही कारणासाठी वीज-वाहून नेण्याकरीता वापरण्यात येणारा वाहक आणि त्याला आधार देणारे खांब, मनोरा इ.सह वीज वहनासाठी येथे जोडलेली इतर सर्व यंत्रोपकरणे व सामुग्री यांचा यात समावेश होतो.
२(२२) [इलेक्ट्रीक प्लॅंट] विद्युत साधन सामग्री:- पारेषण, वितरण किंवा वीजपुरवठयासाठी वापरण्यात आलेले कोणतेही विद्युत साधन,यंत्र,उपकरण याचा यात समावेश असेल.मात्र वीजवाहिनी,विद्युत उर्जामापक,आणि ग्राहकाच्या नियंत्रणात असलेल्या इतर विद्युत उपकरणाचा यात समावेश नसेल.[म्हणजे वीज निर्मिती पासून ग्राहकाच्या वीजपुरवठ्याच्या आरंभ बिंदूपर्यंत वापरण्यात आलेल्या सर्व साधनसामग्रीचा,यंत्रोपकरणाचा यात समावेश असतो.]
२(३०)[जनरेटींग स्टेशन]-विद्युत जनन केंद्र:-आरोहित्र (स्टेपप ट्रॅन्स.),स्विचगियर,स्विचयार्ड,केबलसह वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या / ठरवलेल्या आवारासह, इतर संबंधीत कोणतीही इमारत/वसाहत, संबंधीत जलाशय आणि अन्य सर्व (स्थापत्य,यांत्रिकी,विद्युत)इ.अनुषंगिक कामे यांचा यात समावेश असेल.मात्र उपकेंद्राचा यात समावेश नसेल.
२(४१)[लोकल अथॉरिटी]-स्थानिक प्राधिकारी:-ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका किंवा राज्य/केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली एखाद्या क्षेत्रासाठी अधिकृतपणे जबाबदारी सोपवलेला अधिकारी किंवा बंदर आयोगा सारखे कायदेशीर अधिकारी हा स्थानिक प्राधिकारी असेल.
२(४९)[पर्सन]-व्यक्ती:- कोणतीही कंपनी,सामुदायक मंडळ किंवा संघटन,व्यक्तिगत संयुक्त मंडळ किंवा न्यायालयीन नियुक्त व्यक्तीचा या व्याख्येत समावेश असेल.[ही व्याख्या काळजीपूर्वक पहा. “व्यक्ती” म्हटल्यावर आपल्या मनासमोर काय येते आणि या व्याख्येने काय अभिप्रेत आहे ते समजून घेणे आवश्यक ठरते.]
२(५०)[पॉवर सिस्टिम]-शक्ति प्रणाली:- निर्मिती केंद्र,पारेषण वाहिनी,उपकेंद्र,जोड-वाहिन्या,भार-प्रेषण उपक्रम (लोड-डिस्पॅच अक्टीविटी),मुख्य वा इतर वितरण वाहिनी,उपरी तारमार्ग,सर्वीस लाईन्स,आणि कामे यापैकी काहीसह निर्मिती,पारेषण,वितरण यांच्या विविध अंगासह वीजपुरवठा करणारी यंत्रणा यांचा यात समावेश असेल.
येथे आपण मोजक्याच काही शब्दांच्या-शब्दसमुहांच्या व्याख्यांची माहिती घेतली आहे.नमुन्यादाखल पाहिलेल्या या व्याखेवरून आपल्याला येथे दिलेल्या व्याख्या कशा व किती महत्वाच्या आहेत हे ध्यानात येईल असे वाटते.तसेच मूळ कायदा[अधिनियम] हे इंग्रजीत असल्याने एखाद्या शब्दाचा,वाक्यांशाचा काय अर्थ घ्यायचा याबाबतचे स्पष्टीकरण तेथे त्या भाषेत जे दिले असेल तेच ग्राह्य धरावे असे स्पष्ट निर्देश संशयास्पद स्थिती टाळण्यासाठी म्हणून दिलेले असतात.
मराठी ही समृद्ध भाषा आहे. तिचे शब्दवैभव जरी अफाट असले तरी रोज अनेकानेक तांत्रिक शब्दांची भर पडत आहे. त्याअनुषंगाने आपण जाणिवपूर्वक जेथेजेथे शक्य असेल तेथेतेथे सुलभ मराठी शब्द वापरण्याचा निर्धार करूया. म्हणजे तांत्रिक बाबी सुद्धा सहजतेनं आपल्याला मराठीत मांडणं सोयीचं होईल.

विद्युत कायद्यातील काही व्याख्यांचा आढावा. वर टिप्पण्या बंद

होमिओपॅथी महाविद्यालयाची दयनीय अवस्था !

होमिओपॅथी
महाराष्ट्रातील होमिओपॅथी महाविद्यालयाची अवस्था विद्यार्थी व शिक्षकाअभावी दयनीय झाल्याची बातमी आज वर्तमानपत्रात वाचली. तसं याआधी पण अशा प्रकारच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. आता होमिओपॅथी महाविद्यालयाच्या इमारतीचे ४-५ मजले गायब झाले असल्याची बातमी वाचली आणि तेव्हा शेतातल्या विहिरी गायब झाल्याचे वाचले होते, त्यामुळे डॊक्याला हात लावायची पाळी माझ्यावर आली. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे दर्जाहिन शिक्षणाकडे सगळयानीच पाठ फिरवली. हे झाली काही कारणं पण अजून एक महत्वाचं कारण आहे तिकडं कोणीच लक्ष देत नाही असं कां ? हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. तो म्हणजे या पॅथीच्या विश्वासार्हतेचा !
१७९० मध्ये सॅम्युएल हानेमान यानी या पॅथीचा पाया घातला. मलेरियासाठी उपयोगी पडणारे, सिंकोना झाडापासून तयार केलेले क्विनाइन त्याने स्वतः टॉनिक म्हणून घेण्यास सुरूवात केली तेव्हा त्यास मलेरीयाची लक्षणे जशी असतात त्याप्रमाणे थंडी भरून आली.यावरून त्याने निष्कर्ष काढला की ज्या औषधाच्या सेवनामुळे जी लक्षणे शरीरात निर्माण होतील त्या लक्षणाच्या रोगावर त्याचा ईलाज करता यॆईल. यासाठी त्याने “लाईक क्युअर्स लाईक” असं सूत्र मांडले. तसेच त्या औषधाची मात्रा जशी उणावत नेऊ [पातळ करु] तसं ते औषध रोगावर जास्त परीणामकारक ठरेल आणि इतर दुष्परीणामही कमी होतील असं त्याने जाहीर केलं. त्याचबरोबर ते पातळ औषधीद्रव्य जितके जोरात हलवू तितके ते जास्त परीणामकारक [पोटेंशी] होईल असंही त्यानं जाहिर केलं.
जोरात हलवून पातळ औषधाची [पोटेंशी] शक्ती वाढवणे-
त्याच्या या उपचार पद्धतीसाठी १८०७ मध्ये हानिमानने ’होमिओपॅथी’ या शब्दाची योजना केली. मराठीत त्यास समचिकित्सा असं म्हणता येईल. रोगाच्या लक्षणासारखी लक्षणं निर्माण करणारे औषध देऊन तो रोग बरा करणे म्हणजे समचिकित्सा होय. यासाठी औषध तयार करण्याची रीत पाहिली की आपल्याला बर्‍याच गोष्टी ध्यानात येतील. एका परीक्षानळीत मूळ औषधाचे १०० रेणू घेतले असं समजू. ते औषध दुसर्‍या परीक्षानळीत एकास दहा या प्रमाणात उर्ध्वपातीत जलाने पातळ केले आणि जोरजोरात हलवले की त्याची [पोटेंशी] रोग बरे करण्याची शक्ती वाढते असं समजले जाते.या दुसर्‍या परीक्षानळीतील १० औषधी-रेणूच्या मिश्रणास १x असं म्हणतात. आता तिसर्‍या परीक्षानळीत १x मिश्रण घेऊन ते एकास दहा या प्रमाणात उ.जलाने पातळ करून जोरजोरात हलवले की या १ औषधी-रेणुच्या मिश्रणाची [पोटेंशी]शक्ती २x झाली असं समजलं जातं.आता चौथ्या परीक्षानळीत २x मिश्रण घेऊन ते एकास दहा या प्रमाणात उ.जलाने पातळ करून जोरजोरात हलवले की शून्य औषधी रेणूच्या मिश्रणाची [पोटेंशी] शक्ती ३x झाली असं समजतात. आणि अशा रीतीने ही पोटेंशी वाढवण्याची प्रक्रिया पुढे ४x,५x ——साठी चालू राहते.
येथे x याचा अर्थ १० असा असतो. म्हणून ४x याचा अर्थ हे औषध १०चा चतुर्थ घात इतकं ते पातळ करण्यात आलं आहे. होमिओपॅथिक औषधनिर्माते मूळ औषधाचा एक भाग ९९ भाग उ.जलात मिसळून ते पातळ करतात. याला १०० [पोटेंशीचं]शक्तीचं औषध म्हणजेच १C [पोटेंशीचं]शक्तीचं औषध म्हणतात. पुनःपुन्हा पातळ करून ते २C, ३C.४C—–इत्यादी [पोटेंशीचं]शक्तीची औषधं तयार केली जातात.बाजारात ३०C [पोटेंशीची]शक्तीची औषधं उपलब्ध असतात.याचा अर्थ या औषधामध्ये मूळ औषध १००चा ३०वा घात म्हणजेच १०चा ६० वा घात इतकं अल्पांश [पातळ केलेलं असल्यामुळे]असतं.किंबहूना जवळजवळ काहीच नसतं.कसं ते पहा .
आता याचं विश्लेषण असं होतं की एक ग्रॅम मूळ औषधात १०चा २४ घात इतके रॆणू असतात आणि ते पातळ करतात १०चा ६० घात इतकं.म्हणजे त्यातील रेणूंच्या एकूण संखेच्या कितीतरी अधिकपट ते पातळ केलेले असते. म्हणजेच ३०c होमिओपॅथिक औषधात शुद्ध पाण्याशिवाय काहीच नसतं असं गणिताने सिद्ध होतं.आणि म्हणूनच संशोधक होमिओपॅथिक उपचार पद्धतीस कशी मान्यता द्यावी असा प्रश्न विचारतात. प्लेसबो परीणामाची ताकद इतकी प्रचंड आहे की जोपर्यंत रुग्णाचा या होमिओपॅथी उपचार पद्धतीवर गाढ विश्वास आहे तोपर्यंतच ती एक चांगली पॅथी म्हणून मान्य असेल. इतकंच नव्हे तर सर्व रोगांपैकी ९० टक्के रोगी हे आपोआप- ”प्लेसबो परिणामामुळे”-बरे होत असतात.ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.एकाही रोगाबाबत महत्वाचा असा ठोस पुरावा न मिळाल्याने विविध आजारासाठी होमिओपॅथी औषधाच्या  घेतलेल्या शेकडो ट्रायल्स निरर्थक ठरल्या आहेत. त्यामुळे संशोधक,शास्त्रज्ञ या उपचारपद्धतीस संपूर्णपणे अमान्य करतात.मग या औषधाने आजार बरा झाला असं वाटतं याचं गुपित समजण्यासाठी   प्लेसबो म्हणजे काय याची माहिती करून घेणं आवश्यक ठरतं. त्यासाठी अधोरेखीत प्लेसबो शब्दावर क्लिक करा.

हे सारं ध्यानात घेतलं तर होमिओपॅथी महाविद्यालये आजारी कां आहेत ते लक्षात यायला वेळ लागणार नाही.असं जर आहे तर हे जनता जनार्दनाच्या समोर कां मांडण्यात येत नाही ? कशाला अशा महाविद्यालयावर जनतेचा पैसा खर्च करावा? यावर भारतीय विद्वानानी, विचारवंतानी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढला पाहिजे असं वाटत नाही कां? सत्य कटू असतं ते असं !

pl.reqad this http://www.guardian.co.uk/lifeandstyle/2010/jan/29/sceptics-homeopathy-mass-overdose-boots

होमिओपॅथी महाविद्यालयाची दयनीय अवस्था ! वर टिप्पण्या बंद

सातपातकं !

सातपातकं-”त्यात-विस-पचामा”
पाप आणि पुण्य याविषयी कोणी बोलू लागलं की लोक त्याला वेड्यातच काढतात. कसलं पाप आणि कसलं पुण्य ? असं काही नसतं असं म्हणून अनेक उदाहरणं देऊन पटवण्याचा प्रयत्न सुरू होतो. अमक्याने अमुक इतक्या वाईट गोष्टी केल्या तरी तो मजेत जगतोय. तमक्यानं लोकांना इतकी मदत करूनही तो दुःखात, हाल-अपेष्टात दिवस काढतॊय. इत्यादी. आपल्याला पण मग वाटायला लागतं, खरं काय ? हे की ते ? विचारवंत,संत, महंत यांचं काय सांगणं असतं या बाबत ? त्यांच्यातही एक वाक्यता कोठे आहे ? तेही एकमेकांना नावं ठेवत असतात. मी सांगतो ते बरॊबर, माझ्या मार्गानं गेलात तर तुम्हाला निश्चित मुक्ती मिळणार,वगैरे.
महात्मा गांधीनी सात पातकांचा उल्लेख केला आहे. ”त्यात विस पचामा” चा अभाव हि ती सात पातके आहेत असं ते म्हणतात.त्याग,तत्व,विवेक,सचोटी,परिश्रम,चारित्र्य आणि मानवता या अभावी केलेली कर्मे ही पातके होत असं ते ठासून सांगतात. म.गांधीजीनी एकेका तत्त्वाचा संबंध एकेका व्यवसायाशी जोडलेला आहे. हे कुणाला पटेल कुणाला नाही पटणार ! पण ते काय म्हणतायत ते समजून घ्यायला काय हरकत आहे ? नंतर ठरवता येईल काय करायचे ते ! नाही का? ”त्यात विस पचामा” !
त्यागाशिवाय केलेल्या उपासनेला काहीही अर्थ नाही. त्याग न करता उपासना करणे म्हणजे ते पातकच होय असं म. गांधीजी म्हणत. उपासना करायची असेल तर ती तन,मन,धन अर्पून करावी असं साधू संतानीपण सांगितले आहे. जरा विचार केला तर या म्हणण्यात बरेच तथ्य आहे असं आपल्याला दिसून येते. विद्येची उपासना करायची आहे त्याग करावा लागेल.सत्कर्माची उपासना करायची आहे त्याग करावा लागेल. त्याग करून,लोक कल्याण साधणारं असं जे प्राप्त होईल ते पुण्यप्रद असेल.अन्यथा ते पापच ठरेल. जे कर्म लोक-कल्याणासाठी असेल तेच श्रेयस्कर होय.
तत्वाशिवाय राजकारण म्हणजे पातक होय.तत्वहिन राजकारणाला गांधीजीनी पापकर्म संबोधलं आहे. राजेशाहीत राजा आपल्या राजधर्माचं पालन करण्याचा प्रयत्न करत असे.त्याच्यावर तसे संस्कार होत असत.प्रजेच्या सुखासाठी राजा स्वतःचं बलिदान द्यायलाही मागे पुढे पहात नसे. आजचे राजकारणी काय करत आहेत? समर्थ रामदास म्हणतात-जाणावे पराचे अंतर । उदासीनता निरंतर । नीतिन्यायासी अंतर ।पडोच नेदावे॥ [दासबोध द११स५/६]. नीतिन्यायाशिवाय राजकारण करणे हे अनुचित होय. दुःख दुसर्‍याचे जाणावे । —बरे वाईट सोसावे । समुदायाचे ॥ असं तत्वाचं राजकारण करावे. असा प्रेमळ सल्ला समर्थ देतात. आणि म्हणूनच गांधीजी तत्वाशिवाय राजकारणाला पातक म्हणतात.
विवेकाशिवाय (आनंद)मौजमजा भोगणे म्हणजे पातक कर्म होय.[pleasure without conscience.] हे तिसरं कर्म अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटते. विवेक म्हणजे सद्‍सद्विवेक होय. सद्‍सद्विवेकाशिवाय मौजमजेसाठी जे कर्म होईल ते पापकर्मच होय. मिरवणूक काढणे, रंग खॆळणे, महोत्सव साजरा करणे इ. मध्ये सद्‍सद्विवेक जागृत ठेऊन इतरांना त्रास हॊणार नाही, नियमांची पायमल्ली हॊणार नाही अशा पद्धतीने आनंद उपभोगणे अपेक्षित असते. पण जेव्हा विवेकाशिवाय केलेल्या कर्मातून आनंद-मौजमजा मिळते ते पातक कर्मच असते, हे ध्यानात घेणे आवश्यक्क आहे.
सचोटीशिवाय उद्योग,व्यापार करणे म्हणजे पातक कर्म होय. उद्योग,व्यवसाय,व्यापारामध्ये सचोटी शिवाय यश मिळत नाही. आपण एकदाच एखाद्यास फसवू शकता, पण फसणारा पुन्हा आपल्याकडे येत नाही,इतकेच नव्हे तर तो इतरांनाही आपल्या पापकर्माबाबत जागे करून आपल्याकडे येण्यास मज्जाव करतो.परीणाम आपल्या व्यवसायावर होतो. व्यवसाय वाढीसाठी सचोटीची आवश्यकता असते. सचोटी असेल तर बाजारार आपल्या शब्दाची किंमत वाढते. त्यालाच आपण पत असं म्हणतो.
परिश्रमाशिवाय संपत्ती मिळवणे हे पातक कर्मच होय. भ्रष्टाचार हे या पातक कर्माचं ज्वलंत उदाहरण होय.आजरोजी या पातक कर्माचा सर्वत्र संचार झाला आहे. याचा संबंध नीतिमत्तेशी आहे. नीतिमत्ता गुंडाळून ठेवली की हे पातक कर्म वाढीस लागतं. संतसज्जनानी अशा प्रकारे परिश्रमाशिवाय संपत्ती मिळवण्यास प्रतिबंध केला आहे. अशा संपत्तीचा उपभोग घ्यायला सगळे पुढे असतात पण त्यामुळे होणार्‍या पापामध्ये वाटेकरी हॊण्यास कोणी पुढे येत नसते.
चारित्र्याशिवाय ज्ञानसंपादन हे पातक कर्मच होय. ज्ञानदान सत्पात्री करावे असं म्हंटलं जातं. ज्याला ज्ञान द्यावयाचे त्याने त्या ज्ञानाचा उपयोग समाजकल्याणासाठी केला पाहिजे. उदा- अणुउर्जेचा वापर चारित्र्यवान व्यक्ति मानवी जीवन सुखावह करण्यासाठी करेल तर दुष्ट व्यक्ती या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण समाजास वेठीस धरण्यासाठी करेल.विमान विद्या, रसायन विद्या,स्फोटक विद्या,मानसोपचार शास्त्र इत्यादी सर्व विद्या अविचारी /दुष्ट व्यक्तींच्या हाती पडली तर काय होतं ते समा्ज अनुभवतोय. याप्रमाणे कोणतंही ज्ञान असो ते मिळवणारी व्यक्ती चारित्र्यवान असली पाहिजे. वैद्यकीय ज्ञान,भौतिक विज्ञान,गणित ज्ञान,इ.प्रत्येक शाखेतील ज्ञानसंपादन करणारी व्यक्ती ते घेण्यास योग्य, लायक, आणि चारित्र्यवान असावी. अन्यथा हे पातक कर्म घडेल. मला हे दुधारी पातक कर्म वाटते. ज्ञानदान करणारा आणि ज्ञानसंपादन करणारा असे दोघेही पातक कर्म करतात असं वाटतं. म. गांधीजी या पातक कर्माला knowledge without character असं संबोधतात.
मानवनिरपेक्ष विज्ञान हे पातक कर्म होय. विज्ञानातील शोध हे मानवाच्या उन्नत्तीसाठी,मानवी जीवन सुखावह करण्यासाठी असले पाहिजेत. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा वेगळी परिस्थिती आढळते. अणुबॉंम्बने संपूर्ण गावेच्या गावे बेचिराख करण्याचे, अवघे जीवन उध्वस्त करण्याचे कारणच काय ? काय साध्य झाले यामधून ? या गावातील सर्वसामान्यांनी असा कॊणता गुन्हा केला होता म्हणून त्यांना या अणूबॉम्बच्या वर्षावास सामोरं जावं लागलं ? म्हणून विज्ञानाची मानवनिरपेक्षता म.गांधीना पापकर्म आहे असं वाटते.
वरील “त्यात विस पचामा”ची पातक कर्मे आपल्या हातून घडणार नाहीत याची काळजी आजचा माणूस घेईल का? असा प्रश्न येतोय का मनात? येत असेल तर आपल्याला गांधीजींच म्हणणं पटतय असं समजायला हरकत नाही. अन्यथा ——!!!

Pl.follow this link http://www.doctorhugo.org/gandhi.html

सातपातकं ! वर टिप्पण्या बंद

तांत्रिक महाविद्यालयीन योजनांद्वारे सामाजिक विकास-एक नम्र आवाहन !

तांत्रिक महाविद्यालयीन योजनांद्वारे सामाजिक विकास-एक नम्र आवाहन !
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने सामाजिक विकास साधण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी तांत्रिक महाविद्यालयीन योजनांचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय-कौशल्य विकसन मंडळाने इ.स.२०२० पर्यंत ५००दशलक्ष कुशल कर्मचारी तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.मंडळाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी विविध मंत्रालयीन विभागांनी कंबर कसली आहे.[http://www.education.nic.in/tech/Guidelines-CDTP.pdf येथे संपुर्ण तपशिल पहा]
या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आणि उपक्रम असे असतील–
१) तंत्रशास्त्र आणि प्रशिक्षण याची किती गरज आहे याचा शोध घेणे
२) निवड केलेल्या गटास कौशल्य-विकसन प्रशिक्षण देणे.
३) उत्पादनात वाढ व्हावी म्हणून उचित तंत्रशास्त्राचा प्रसार करणे.
४) झोपडपट्टी रहिवाशी आणि खॆडूत लोकांना तांत्रिक व इतर सहाय्यक सेवा उपलब्ध करून देणे.
५) महत्वाच्या आणि अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीबाबत संबंधित गटास माहिती देणे
.
वरील उपक्रम यशश्वी करण्यासाठी तांत्रिक महाविद्यालयाची निवड करण्यात येईल आणि त्यांचे मार्फत त्या भागाची तांत्रिक गरज काय आहे याचा शोध घेण्यात येईल. तिथल्या स्थानिक गरजांनुसार व मागणीनुसार प्राधान्याने विविध व्यावसायिक-तांत्रिक कौश्यल्याचे ३ते६ महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. असे कुशल प्रशिक्षित स्वयंरोजगार निर्माण करु शकतील अशी व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी संबंधीत इच्छुक गटास योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येईल.
तांत्रिक आणि सहाय्यक सेवा-
ग्रामीण भागात हल्ली विविध प्रकारची यंत्रसामुग्री वापरली जाते. त्यात शेतीसाठी तसेच बिगर शेतीसाठी म्हणून अद्यावत यंत्रोपकरणांचा समावेश होतो. अशा यंत्रोपकरणांची देखभाल,दुरुस्ती आणि डागडूजीची सोय त्याच भागात होण्यासाठी तांत्रिक महाविद्यालयानी पुढाकार घेऊन याविषयांचे अद्यावत प्रशिक्षण देण्याची योजना आखली पाहिजे, असं शासनाचं धोरण आहे. यात खालिल गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असेल.
१) यंत्रोपकरणांची जागेवरच किरकोळ दुरुस्ती व देखभाल.
२) ग्रामसमुहास तांत्रिक सेवा देणारी सेवाकेंद्रे.[सर्विस सेंटर्स]
३) अशी सेवाकेंद्रे आणि दुरुस्ती केंद्रे यात प्रामुख्याने ग्रामस्थांचा सहभाग राहील असे पाहणे.
४) ग्रामीण भागात ठराविक दिवसांच्या अंतराने तांत्रिक सेवा मेळावे भरवणे.
५) प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करून ग्रामीण स्तरावर तांत्रिक सल्ला-सेवा उपलब्ध करुन देणे.

यासाठी ग्रामीण स्तरावर ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शेतकरी मेळावे,प्रदर्शने,चर्चासत्रे इ. आयोजन करण्यात येईल. रेडिओ, टि.व्ही, व्हि.डी.ओ.वर्तमानपत्रे, जाहिराती वगैरे, या माध्यमांचा मुक्त हस्ते वापर करण्यात येईल.
आर्थिक पाठबळ-
ही सामाजिक विकासाची ही योजना राबवण्यासाठी तांत्रिक महाविद्यालयाची [पॉलिटेकनिक्स] निवड करण्यात येईल.केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या-उच्च शिक्षण विभागातर्फे [Ministry of Human Resourses Developement -Dept.of Higher Education] जास्तीत जास्त २० लाख रुपयांचे अनुदान तांत्रिक महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे/ संचालकाकडे देण्यात येईल.तसेच दरवर्षी पुनरावृत्ती अनुदान म्हणून जास्तीत जास्त १७ लाख रूपये देण्यात येतील. अशा प्रकारची आर्थिक तरतूद या मंत्रालयाने केलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्याची पात्रता-
[AICTE] ने मान्यता दिलेली तांत्रिक महाविद्यालयाना या योजनेत भाग घेता येईल.पूर्वोत्तर राज्ये,डोंगराळ आणि सीमावर्तीय भाग आणि मागासवर्गीय अनुसूचित-जाती-जमाती,[SC/ST]अल्पसंख्यांकाचे जिल्हे-येथील तांत्रिक महाविद्यालयाना [पॉलिटेक्निस] प्राधान्य देण्यात येईल.
वरील योजनेची अंमलबजावणी प्रभावी झाल्यास देशाचा विकास आणि भरभराट हॊण्यास हातभार लागेल. हा दृष्टीकोन समोर ठेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे, महाड,जिल्हा रायगड यांच्या सहकार्याने ”सर्वांगिण मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठान, शिवथरघळपायथा,ता.महाड जि.रायगड” ही संस्था गेली पाच वर्षे निरलसपणे आणि समर्पित भावनेने विद्युत तांत्रिक मोफत प्रशिक्षणाचा लाभ रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काही शाळांतील विद्यार्थीना देत आहे. यामध्ये प्रामुख्याने इयत्ता ९वी आणि १० वी च्या इच्छुक मुलांची निवड विद्युत तांत्रिक प्रशिक्षणासाठी करण्यात येत असते. या विद्युत तांत्रिक मोफत प्रशिक्षणासाठी प्रतिष्ठान ने दक्षवीजतंत्री ही पुस्तिका मोफत उपलब्ध करून दिलेली आहे.[याची माहिती देणारा लेख येथे वाचा-[ https://savadhan.wordpress.com//2010/01/30/वीजतंत्री-मोफत-प्रशिक्ष किंवा http://mr.wordpress.com/tag/social/ ] परीणामस्वरूप या भागात विद्युत तांत्रिक विषयाशी संबंधीत कामासाठी वायरमन,इलेक्ट्रीशियन यांची उपलब्धता वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे दृश्य केंद्र शासनाच्या धोरणांशी सुसंगत असेच आहे.
आम्ही या पत्रकाद्वारे नम्र विनंती करतो की आपल्या सहभागासह केंद्र शासनाच्या अनुदानाचा लाभ घेऊन अशा प्रकारचे मोफत प्रशिक्षण इतर व्यावसायिक विषयासाठी [जसे- वेल्डर,मोटर-रिवांडींग,विद्युत उपकरणे-दुरुस्ती व देखभाल,हाऊस वायरींग इ.] राबवण्यासाठी समाजातील विद्युत कंत्राटदार, विद्युतव्यावसायिक,  विद्युतसंघटना, उत्पादक आणि इतर सर्व प्रकारचे उद्योजक यानी पुढे येऊन शासनाचा हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावावा. जेणेकरून त्याभागात या प्रशिक्षित मनुष्यबळाचा उपयोग आपण आपल्या व्यवसाय वाढीसाठी करू शकाल. आणि याचसाठी येत्या ४-६ महिन्यात विद्युत व्यावसायिकांचा मेळावा घेण्याचा आमचा मानस आहे.या कामात महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या  विद्युत कंत्राटदार महासंघाने सक्रिय सहभाग घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

पुढील पृष्ठ »